सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्यशोध न्यूज
पाचोरा (प्रतिनिधी): तालुक्यात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांतील ओढे, नाले आणि नदीपात्रांतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर आणखी काही भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, पाचोरा यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच कोणतीही जोखीम न घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाने जारी केलेल्या सूचनेनुसार, नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत भरून वाहणारे ओढे, नाले किंवा नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच पूरग्रस्त किंवा धोकादायक भागात अनावश्यक गर्दी टाळावी. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी बांधवांनी शेतातील मोटार, वीज उपकरणे तसेच इतर महत्त्वाचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे. रात्रीच्या वेळी विशेष दक्षता बाळगावी आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संबंधित ग्रामपंचायत, महसूल प्रशासन किंवा स्थानिक यंत्रणेशी संपर्क साधून मदत घ्यावी. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि इतरांनाही सतर्कतेचा संदेश द्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.
"आपली सुरक्षितता हीच सर्वात महत्त्वाची आहे. कृपया सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा," असे आवाहन तहसील कार्यालय, पाचोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment