पत्रकारांचा अपमान करणाऱ्या वक्तव्याविरोधात पिंपळगाव हरेश्वर परिसर पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कारवाईची मागणी
राजेंद्र खैरनार (पाचोरा)मुख्य संपादक
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपळगाव हरेश्वर परिसर पत्रकार संघाच्या वतीने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना निवेदन देण्यात आले. संबंधित वक्तव्य हे पत्रकारितेचा अवमान करणारे आणि लोकशाही मूल्यांवर आघात करणारे असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शासन आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करतात. समाजातील विविध घडामोडी जनतेपर्यंत वस्तुनिष्ठपणे पोहोचविणे, लोकहिताचे प्रश्न मांडणे, सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे आणि जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचविणे ही पत्रकारांची घटनात्मक व नैतिक जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी अपमानास्पद भाषा वापरणे ही संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राची अवहेलना असल्याची भावना पत्रकार संघाने व्यक्त केली.
पिंपळगाव हरेश्वर परिसर पत्रकार संघाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी पत्रकार बांधवांची जाहीर व लेखी बिनशर्त माफी मागावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या वर्तनाची चौकशी करून कायद्याच्या चौकटीत आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात यावी, भविष्यात पत्रकारांचा अवमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे धोरण शासनाने जाहीर करावे आणि राज्यातील पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी पत्रकार संरक्षणासंदर्भातील उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या निवेदनावर किशोर नारायण लोहार (देशोन्नती), भिकन सदाशिव पाटील (पुण्यनगरी), रविशंकर आर. पांडे (देशदूत), हेमशंकर तिवारी (लोकमत), सुनील लोहार (लोकमत), दिलीप जैन (सत्यजित न्यूज), दिपक मुलमुले (दिपलक्ष न्यूज), चिराग शहा (सत्यनीत न्यूज), राजू ठाकूर (लोकशाही), इसा तडवी (सुवर्ण खानदेश न्यूज), रोशन जैन (लोकमत) आणि चंद्रकांत मोहर (दिव्य मराठी) यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
पत्रकारांच्या सन्मानाचा प्रश्न हा केवळ पत्रकारितेपुरता मर्यादित नसून लोकशाहीच्या सुदृढतेशी निगडित असल्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा पिंपळगाव हरेश्वर परिसर पत्रकार संघाने व्यक्त केली आहे
Comments
Post a Comment