“कृषी सेवेला मानाचा मुजरा; पाचोर्याचे अशोक जाधव यांना ‘कृषि सेवा रत्न’ पुरस्काराने गौरव"....शिरडीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते सन्मान; कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल*
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चैनल
शिरडी, जि. अहिल्यानगर – दिनांक १७ मे २०२६ रोजी शिरडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात पाचोरा तालुक्याचे सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्री. अशोक विश्राम जाधव यांना प्रतिष्ठेचा “कृषि सेवा रत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रात अनेक वर्षे प्रामाणिक, अभ्यासपूर्ण आणि शेतकरीहिताच्या दृष्टीने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार शिरडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषि विभागाचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्र गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमास कृषि विभागातील अधिकारी, उद्योजक, प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी, पत्रकार बंधू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. अशोक जाधव यांनी आपल्या सेवाकाळात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, जलसंवर्धन, सेंद्रिय शेती आणि उत्पादनवाढीसाठी सातत्याने मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचवून त्यांनी कृषी विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यशैलीत सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि शेतकरीहिताचा ध्यास स्पष्टपणे दिसून येत असल्यानेच त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
पुरस्कार स्वीकारताना श्री. जाधव यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबीयांसह शेतकरी बांधवांना समर्पित करताना कृषी क्षेत्रात अजूनही मार्गदर्शनाचे कार्य सुरू ठेवण्याची ग्वाही दिली. त्यांच्या या यशामुळे पाचोरा तालुक्यासह जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment