भर उन्हात काकडी विक्री करताना उष्माघाताचा बळी; पाचोर्यात फळविक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यूप्रशासनाने जनतेला सतर्कतेचे आवाहन करावे; भोई कुटुंबाला तातडीची मदत द्या — सचिन सोमवंशी
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा city मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फळ विक्री करणारे आनंद नथ्थु भोई (वय 32) यांचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भर उन्हात दिवसभर काकडी विक्री करत असताना आनंद भोई यांनी डोक्यावर कोणतेही संरक्षण घेतले नव्हते. वाढत्या तापमानामुळे त्यांना उष्माघाताचा फटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात भेट देत मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच मयत आनंद भोई हे घरातील कर्ते पुरुष असल्याने शासनाने भोई कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मयताच्या पश्चात विधवा आई, पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सध्या राज्यात व परिसरात उन्हाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी भर उन्हात विनाकारण बाहेर पडू नये, डोक्यावर संरक्षण वापरावे, पुरेसे पाणी प्यावे तसेच उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment