“लेडी सिंघम” कल्याणी वर्मा यांचा धडाका; हरेश्वर पिंपळगावसाठी पुढील ५ वर्षे त्यांचीच नियुक्ती करा – महिला व नागरिकांची आक्रमक मागणी!
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांनी महिलांना विविध क्षेत्रांत ३० ते ३३ टक्के आरक्षण दिल्यामुळे आज महिला सक्षमीकरणाला नवे बळ मिळत आहे. याच धोरणाचा सकारात्मक परिणाम पोलीस खात्यातही स्पष्टपणे दिसून येत असून, जळगाव जिल्ह्यात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये महिला अधिकारी प्रभावीपणे काम करताना दिसत आहेत.
जळगाव जिल्ह्यात साधारणतः ८ ते १० पोलीस ठाण्यांमध्ये महिला अधिकारी कार्यरत असून, त्यामध्ये हरेश्वर पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांचे नाव विशेष ठळकपणे समोर येत आहे. गेल्या एक वर्षापासून त्या येथे कार्यरत असून, त्यांनी आपल्या धडाकेबाज आणि निर्भीड कारवाईमुळे संपूर्ण परिसरात गुन्हेगारीवर वचक निर्माण केला आहे.
एपीआय कल्याणी वर्मा यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर जोरदार कारवाईचा सपाटा लावला. त्यांच्या कठोर भूमिकेमुळे दोन नंबरचे व्यवसाय करणाऱ्यांनी अक्षरशः आपले बस्तान गुंडाळत इतर मार्ग स्वीकारले आहेत. परिणामी, पिंपळगाव परिसरात शांतता, कायदा आणि सुव्यवस्थेचे वातावरण अधिक मजबूत झाले आहे.
तरुण, धाडसी आणि कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याणी वर्मा यांच्या काम करण्याच्या वेगळ्या स्टाईलमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. विशेषतः महिलांच्या तक्रारींवर त्यांनी दिलेला न्याय आणि तत्पर प्रतिसाद यामुळे त्या “लेडी सिंघम” म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत स्थानिक महिला व पुरुष नागरिकांनी त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. समाजात महिलांना न्याय देण्यासाठी सक्षम महिला अधिकारी किती महत्त्वाची असते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे एपीआय कल्याणी वर्मा होय.
दरम्यान, हरेश्वर पिंपळगाव परिसरातील नागरिकांकडून एकमुखी मागणी पुढे येत आहे की, परिसरात शांतता व कायद्याचा धाक कायम राखण्यासाठी एपीआय कल्याणी वर्मा यांचीच पुढील किमान पाच वर्षे येथे नियुक्ती करण्यात यावी. त्यांच्या नेतृत्वाखाली परिसर अधिक सुरक्षित आणि गुन्हेमुक्त होईल, असा ठाम विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
Comments
Post a Comment