“इमानदार, कार्यतत्पर आणि वारकरी संस्कार जपणारे तहसीलदार विजय बनसोडे – एक क्षणही वाया न घालवणाऱ्या अधिकाऱ्यांचा धरणगाव तहसिलकडून सन्मान”
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी) – कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि सतत जनतेच्या सेवेत तत्पर राहणारे पाचोरा तालुक्याचे तहसीलदार मा. श्री. विजय जी बनसोडे यांना धरणगाव तहसील कार्यालयाकडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे ते “इमानदार आणि सत्यनिष्ठ अधिकारी” म्हणून ओळखले जात असून, प्रशासनात एक आदर्श निर्माण करत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिन निमित्त उत्कृष्ट सेवा देत नागरिकांची कामे वेळेत पूर्ण केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला. दि. २८ एप्रिल २०२६ रोजी अपर जिल्हाधिकारी जळगाव मा. डॉ. श्रीमंत हारकर यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
तहसीलदार विजय बनसोडे यांची कार्यपद्धती अत्यंत शिस्तबद्ध आणि वेळेचे काटेकोर नियोजन करणारी आहे. विशेष म्हणजे, ते आपल्या शासकीय कामाचा एक क्षणही वाया जाऊ देत नाहीत. नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवून प्रशासनातील कार्यक्षमता वाढविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
वारकरी संप्रदायातील माळकरी म्हणून त्यांच्या आयुष्यात साधेपणा, सेवाभाव आणि प्रामाणिकता हे गुण खोलवर रुजलेले आहेत. हेच संस्कार त्यांच्या शासकीय कामातही दिसून येतात. जनतेशी नम्रतेने वागणे, पारदर्शक निर्णय घेणे आणि कोणत्याही प्रकारचा विलंब न करता काम पूर्ण करणे ही त्यांची खास वैशिष्ट्ये ठरली आहेत.
या सन्मानामुळे पाचोरा तालुक्याच्या प्रशासनाची प्रतिष्ठा अधिक उंचावली असून, त्यांच्या कार्याचा आदर्श इतर अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तहसीलदार विजय बनसोडे यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment