भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन करणाऱ्या काँग्रेस आंदोलनाचा युवासेनेचा तीव्र निषेध – जितेंद्र जैन
पाचोरा | प्रतिनिधी
भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात केलेली प्रगती आणि तंत्रवैभव जगासमोर सादर करण्यासाठी आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ या जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण परिषदेत भारताचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न सुरू असताना, भारत मंडपममध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या असभ्य गोंधळामुळे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी केला आहे.
या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करताना जितेंद्र जैन म्हणाले की, “भारताची तंत्रशक्ती आणि नवकल्पनांची क्षमता जगासमोर मांडण्याचा हा सुवर्णसंधीचा क्षण असताना काँग्रेसच्या युथ विंगने केलेली घोषणाबाजी व गोंधळ ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशा प्रकारच्या कृतींमुळे विदेशी पाहुण्यांसमोर आपल्या देशाची प्रतिमा खराब होते. हे देशप्रेम नव्हे, तर देशद्रोहासारखे कृत्य आहे.”
राजकीय विरोधाची सैद्धांतिक मांडणी आवश्यक
भारत-अमेरिका करारासंदर्भात काँग्रेसला आक्षेप असतील, तर त्यांनी लोकशाही पद्धतीने, तथ्यात्मक व सैद्धांतिक मांडणी करावी, असेही जैन यांनी नमूद केले. “लोकशाहीत विरोध करणे हा अधिकार आहे, मात्र विरोध करण्याचीही एक जबाबदार पद्धत असते. सभागृहात, पत्रकार परिषदेत किंवा लोकांसमोर तर्कसंगत मुद्दे मांडण्याऐवजी, आंतरराष्ट्रीय परिषदेत गोंधळ घालून घोषणाबाजी करणे ही निषेधार्ह बाब आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
देशाची माफी मागावी – युवासेनेची मागणी
या घटनेबाबत काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी देशातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे. “भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. राजकीय मतभेद असले तरी देशाची प्रतिमा सर्वांच्या वर असली पाहिजे,” असे मत जितेंद्र जैन यांनी व्यक्त केले.
शिवसेना आणि युवासेना या घटनेचा निषेध करीत असून, भविष्यात अशा प्रकारच्या असभ्य वर्तनाला आवर घालावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
– प्रतिनिधी
सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा, जि. जळगाव
Comments
Post a Comment