निवडणूक शांततेसाठी कठोर निर्णय : मतदान व मतमोजणीच्या दिवशी "आठवडे बाजार बंद"
(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल)
लोकशाहीचा उत्सव शांततेत पार पडावा, हा प्रशासनाचा मूलभूत उद्देश असतो. जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक–2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी घेतलेला आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय हा त्याच दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरते.
मतदान व विशेषतः मतमोजणीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी, अफवा, गैरसमज व संभाव्य तणाव लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत बाजार भरल्यास नागरिकांची अनावश्यक वर्दळ वाढून सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन दि. 20 डिसेंबर 2025 रोजी मतदानाच्या दिवशी व दि. 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीच्या दिवशी नगर पालिका हद्दीतील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, हा निर्णय व्यापारी किंवा सामान्य नागरिकांच्या विरोधात नसून लोकशाही प्रक्रियेच्या सुरक्षिततेसाठी आहे. बाजार अन्य दिवशी भरविण्याची मुभा देऊन प्रशासनाने जनतेच्या सोयीचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांनुसार व कायदेशीर चौकटीत घेतलेला हा निर्णय प्रशासकीय संवेदनशीलतेचे द्योतक म्हणावा लागेल.
लोकशाहीची खरी ताकद शांतता व शिस्तीतूनच दिसून येते. त्यामुळे नागरिक, व्यापारी व सर्व संबंधित घटकांनी प्रशासनाच्या या निर्णयाला सहकार्य करून निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी पुढे यावे, हीच अपेक्षा.
Comments
Post a Comment