एक मत, पण मोठा निर्णय! सौ.कविता आबा सोनवणे(कोळी) "सरपंचपदी" विराजमान; ग्रामराजकारणात नवे पर्व सुरू...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा ग्रामीण प्रतिनिधी:
पाचोरा तालुक्यातील पुनगाव ग्रामपंचायतीच्या राजकारणात कधी कधी एखादा निर्णय अवघ्या एका मतावर ठरतो, मात्र त्याचा परिणाम संपूर्ण गावाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरतो. अशीच एक महत्त्वपूर्ण घडामोड नुकतीच ग्रामपंचायतीत घडली असून मनोज अधिकराव पाटील यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर, रिक्त झालेल्या पदासाठी झालेल्या निवडणुकीत सौ.कविता आबा सोनवणे(कोळी) यांची अवघ्या एक मताच्या फरकाने सरपंचपदी निवड करण्यात आली.
ही निवड केवळ आकड्यांची नसून ग्रामपंचायतीतील बदलत्या राजकीय समीकरणांची साक्ष देणारी ठरली आहे. विशेष सभेच्या माध्यमातून पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत लोकशाही मूल्यांची जपणूक करत ग्रामपंचायत सदस्यांनी आपली भूमिका मांडली.
या वेळी श्री.चिंतामण पाटील, श्री.प्रल्हाद गुजर, श्री.अनिल परदेशी, श्री.मनोज पाटील, श्री.मुकेश पाटील, श्री.अनिल पाटील, श्री.शिवलाल मोची हे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासकीय बाजू सक्षमपणे सांभाळत ग्रामसेवक विकास पाटील यांनी निवड प्रक्रिया सुरळीत पार पाडली.
या राजकीय घडामोडींकडे लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे जळगाव–पाचोरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांचे शिवसहायक श्री.प्रविण पाटील यांची उपस्थिती लाभली. त्यामुळे या निवडीला केवळ स्थानिकच नव्हे तर राजकीय पातळीवरही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नवनिर्वाचित सरपंच सौ.कविता आबा सोनवणे(कोळी) यांनी पदभार स्वीकारताना गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला. “राजकारणापेक्षा गावाचा विकास महत्त्वाचा असून, सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक, लोकाभिमुख व विकासाभिमुख कारभार केला जाईल,” असे त्यांनी सांगितले.
अवघ्या एका मताने ठरलेला हा निकाल भविष्यातील ग्रामविकासाची दिशा ठरवणारा ठरेल, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. आता ग्रामपंचायतीकडून विकासकामे, एकजूट आणि जबाबदार नेतृत्व याची अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment